२नोव्हेंबर
माझ्या रितेपणाचा मला विषाद नाही,
वस्ती मला दिसेना जेथे जिहाद नाही,
देवालयात येथे उरलाय देव कोठे
पैशाशिवाय येथे प्रसाद नाही,
ही कविता आहे आळेफाटा येथून आलेल्या कवी जयसिंग गाडेकर यांची.
पुढील जन्मी देवा होऊ दे कवी,
नको श्रीमंती घरी देवा असू दे गरीबी
तर ही आहे तळेगाव चे श्रीकृष्ण पुरंदरे यांची
अशा एकाहून एक सरस कवींनी रसिकांना खिळवून ठेवत काव्य पहाट मध्ये रंगत आणली.
निमित्त होते महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड ने आयोजित केलेल्या काव्य पहाट मधील * काव्य रंगे उषःकाल संगे * या कार्यक्रमाचे. सदर कार्यक्रम निगडी प्राधिकरण येथील सावरकर सदन येथे उत्साहात संपन्न झाला.जेष्ठय साहित्यिक गिरीश प्रभुणे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर रोटरी क्लब चिंचवड चे अध्यक्ष बाळकृष्ण खंडागळे, उद्योजक बाबासाहेब माने, उद्योजिका निशिता घाटगे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सोबत व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड चे अध्यक्ष राजन लाखे, कार्याध्यक्ष विनिता ऐनापुरे, रो. सतीश आचार्य उपस्थित होते.यावेळी मान्यवरांचा हस्ते मराठी साहित्य कला मंडळ आणि बुकशेल्फ प्रकाशित $ अक्षरवेध $ या दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन झाले.
या रंगलेल्या या काव्य पहाट मध्ये बाबू डिसोझा यांनी “उजळू दे दीप सारे आली दिवाळी” ही दिवाळी वरील कविता, रघुनाथ पाटील यांनी….”तुला पाहता हालत माझी टाइट होते ही विनोदी कविता, अश्विनी रानडे यांनी ” व्हय म्याच बोलतुया , जिंदा होतो तेंव्हा कोनी विचारले नाही ही ग्रामीण ढंगातील कविता, प्रकाश निर्मळ यांनी ” निवडणूक आयोगाचे आलंय फर्मान ही नुकत्याच झालेल्या निवडणुकीवर भाष्य करणारी कविता तर “ईश्क है जिंदगी प्यार है जिंदगी” ही बी. एस. बनसोडे यांची जीवनाचा वेध घेणारी कविता अशा वैविध्यपूर्ण विषयावर पिंपरी चिंचवड मधील तसेच पुणे जिल्ह्यातून आलेल्या कवींनी रसिकांची वाहवा मिळवली.त्याचप्रमाणे प्राची देशपांडे, मयुरेश देशपांडे, अनघा पाठक, डॉ. सत्येंद्र मराठे, शशिकला देवकर, रमाकांत श्रीखंडे, अपर्णा मोहिले, विनोद गायकवाड , सीमा गांधी, सुभाष चटणे , कमल सोनजे, डॉ. सुधीर काटे, माधुरी दातार, दत्तू ठोकळे, निर्मला वाल्हेकर, दीपक अमोलिक आदी कवींनी आपल्या काव्यमय शब्दांनी रसिकांना खिळवून ठेवले. एकूण ४० कवींनी आपला सहभाग नोंदविला. सदर कार्यक्रमात प्रश्नमंजुषा या सदरात उपस्थित रसिक व लेखकांना सौ मंगला पाटस्कर आणि विनीता श्रीखंडे यांनी साहित्य विषयावर आधारित विविध प्रश्न विचारून त्यांना बोलते केले आणि कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित केला.
रिचा राजन व सपना पाटस्कर यांनी मराठी गीते सादर केली.कार्यक्रमाचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे यांनी आपल्या भाषणात कार्यक्रमातील प्रत्येक क्षण हा चिमटीत पकडून ठेवावा असे प्रतिपादन करून कवींच्या हातून विपुल व दर्जेदार लेखन घडावे अशी आशा व्यक्त केली.
राजन लाखे यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मसाप च्या विविध उपक्रमाची माहिती दिली.माधुरी मंगरुळकर आणि डी. बी.शिंदे यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले . विनीता ऐनापुरे यांनी आभार मानले. अंजली कुलकर्णी, किरण लाखे, सागर रोकडे सुप्रिया ऐनापुरे यांनी संयोजन केले.


