शेतकरी दिल्लीत येऊ नयेत म्हणून दिल्लीच्या सीमेवर खिळे लावले असल्यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. हे खिळे जर भारत-चीन सीमेवर लावले असते तर चीनचं सैन्य भारतात घुसलं नसतं असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लावला आहे. शेतकऱ्यांना अतिरेक्यांपेक्षाही वाईट वागणूक दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. खासदार संजय राऊत आज दिल्लीतील शेतकरी आंदोलकांची भेट घेणार आहेत.
खासदार संजय राऊत म्हणाले की, “भारत-चीन सीमेवर अशा प्रकारचे खिळे लावले असते तर चीनचं सैन्याने 20 किलोमीटर आतमध्ये घुसून आमच्या जमिनी ताब्यात घेतल्या नसत्या. शेतकरी आंदोलनाच्या बाबतीत मात्र हा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे, हे दुदैव आहे.”
खासदार संजय राऊत पंतप्रधानांवर टीका करताना म्हणाले की, “एक कॉल करुन जर आंदोलन मिटत असेल तर मग त्याला विलंब का? मी शेतकरी आंदोलकांना भेटायला जातोय. त्याची मला परवानगी देण्यात आली नाही, पण मी कुणाला घाबरत नाही. आम्हाला पोलिसांनी अडवलं, अटक केली तरी बेहत्तर, त्याची चिंता नाही.
“शेतकऱ्यांना नैतिक पाठिंबा देणं आवश्यक आहे. देशातल्या प्रत्येक नागरिकाला दिल्लीत जाऊन शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देता येत नसेल तरी जिथे ते आहेत त्या ठिकाणाहून त्यांनी पाठिंबा द्यावा. हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आणि हाच तिरंग्याचा सन्मान आहे,” असेही राऊत म्हणाले.