केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर महाविकास आघाडी सरकारने जाहीर नाराजी व्यक्त केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनीदेखील बजेटचा डोलारा महाराष्ट्रावर अवलंबून आहे पण आम्हाला निराशा करणारा आहे अशा शब्दांत अर्थसंकल्पावर टीका केली. सोबतच खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. तसे हे दिल्लीतील बाजीराव आहेत असा टोलाही लगावला. दरम्यान भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.
अतुल भातखळकर यांनी ट्विट केलं असून “जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा…” अशा शब्दांत संजय राऊतांच्या टीकेला उत्तर देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, मुंबई मेट्रो केंद्रानं का रखडवून ठेवली आहे याबद्दल त्यांनी बोलावं, अशी मागणी राऊत यांनी केली. “केंद्राची जमीन आहे, केंद्राची जमीन आहे म्हणत मुंबई मेट्रोचा प्रकल्प रखडवला आहे. ती जमीन केंद्रानं महाराष्ट्रात मंगळावरुन आणलीय की चंद्रावरुन?, आहो ती आमचीच जमीन आहे. मुंबई मेट्रो आम्हाला सुरु करु द्या ना. तुम्ही आम्हाला नागपूर नाशिकचं काय सांगताय. ही दोन्ही शहरं महाराष्ट्रातच आहे काय उत्तर ध्रुवावर नाहीयेत,” असं मत राऊत यांनी व्यक्त केलं.
महाराष्ट्राची उपराजधानी असणाऱ्या नागपूरमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मेट्रोचं जाळं उभारण्यासाठी पाच हजार ९०० कोटी रुपये दिले जाणार असल्याचं निर्मला यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे नाशिकमध्येही मेट्रोचं काम होणार असून यासाठी दोन हजार ९२ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा निर्मला यांनी केली आहे.